मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Sunday, February 7, 2021

संतुष्ट जगण्यामरण्याचा सल्ला देणारे माझे आजोबा

 

संतुष्ट जगण्यामरण्याचा सल्ला देणारे माझे आजोबा 

 Vyaspeeth Nashik 2012 

(On प्रशासनाकडे वळून बघतांना -- तिथे सुद्धा हाच लेख आहे.)

माझे बालपणांतील पहिले दशक धरणगांव आणि जबलपुरला गेले. ते खाऊन पिऊन सुखी दिवस होते, पण शान-शौकत, चैन आदि न परवडणारे होते. आजोबा म्हणजे नाना वृद्धत्वाकडे झुकलेले, सबब स्वतः सुरू केलेले लाकूड-वखारीचे दुकान वाटणीत धाकट्या भावाला देऊन टाकले होते. माझ्या धाकट्या आत्याला घटस्फोट घ्यावा लागला असल्याने ती व तिच्या मुलीची जबाबदारी व काळजी दोन्हीं त्यांच्यावर आणि अनुषंगाने आई-दादांवर होती. त्यांत दादा पीएचडी म्हणजे अति उच्च-शिक्षित असूनही त्यांना साधी शिक्षकाची पर्मनंट नोकरी मिळत नव्हती. धरणगांवलाच मोठी शाळा, हायस्कूल इत्यादि असल्याने जवळपासच्या खेड्यांत असलेली चुलत-आते भावंडं नानांकडेच रहायला येत. आणि लग्नावेळी मॅट्रिक असलेल्या आईने पुढे शिकावे अशी आई-दादा आणि नाना सर्वांचीच इच्छा होती. पण  बाहेरगांवचे रेग्युलर कॉलेज परवडणारे नव्हते. नागपूरच्या एसएनडीटी युनिव्हर्सिटीतून प्रायव्हेट परीक्षा देण्यासाठी सुद्धा आईला एक-दोन महीने तिथल्या होस्टेलमधे राहून अभ्यास करावा लागत होता तेंव्हा मी मोठेपणाने खळखळ न करता नानांजवळ रहात असे. 

मग दादांना जबलपुरला कॉलेजात  प्राध्यापकाची नोकरी मिळून आम्ही जबलपुरला आलो तेंव्हाना नानांची प्रकृति खालावली होती. त्यांना क्षयाची बाधा झाली होती पण त्याकाळी क्षयाला औषध नव्हते. त्यांतल्या त्यांत आत्याला नर्सिंग कोर्सला प्रवेश मिळून तीन वर्षांनंतर का होइना, पण तिला नोकरी मिळून करियर व अर्थार्जनाला सुरुवात होईल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र यासाठी ती तीन वर्षे माझ्या आतेबहिणीची जबाबदारी आईने घेणे भाग होते त्यामुळे ती पण आमच्याबरोबर जबलपुरला आली. 

या सर्वाचा परिणाम असा झाला की मी कधीच कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करत नसे असे आई सांगते. याउलट मी जेंव्हा आयुष्यांतील त्या काळाकडे पहाते  तेंव्हा मला त्या काळांत हव्या त्या सर्व गोष्टी आपणहून मिळत होत्या आणि हट्ट करावा लागल्याची वेळच आली नाही असे मला वाटते. मला काय हवे असे? तर वर्गात पहिला नंबर (निदान वरचा) असावा, वाचायला खूप खूप गोष्टींची पुस्तकं असावीत, खेळतांना कुणी बस-पुरे म्हणू नये. या तीन्ही वस्तू मला मिळत होत्या. खूप भारी खेळणी, ड्रेस, दागदागिने यांची हौस नव्हती. नाना-दादांना कुठलेही व्यसन नव्हते. आई चहा घ्यायची, पण मुलांना मात्र चहाची सवय नको असा तिचाही खाक्या होता. 

आईला अधून-मधून सिनेमा बघायला आवडत असे. धरणगांवी असतांना तिला पुढे करून माझ्या दोन्हीं धाकट्या चुलत आत्या आणि चुलत बहिणी नानांकडून सिनेमाला जायची परवानगी मिळवायच्या. त्यांचे गणित कच्चे म्हणून नाना वैतागत असत आणि आई सिनेमाला गेली म्हणून मला घेऊन गणित शिकवत बसत. त्यामुळे मला स्वतःचे खूप कौतुक वाटायचे की कसं गणितापुढे मला अन्य मनोरंजनाची गरज भासत नाही. अगदी आजही मला खात्री वाटते की टीव्हीच्या कित्येक सिरीयल्सपेक्षा अधिक टीआरपी देणारी सीरीयल आपण रंजकतेने शिकवलेल्या अभ्यासातून निर्माण करू शकतो. नुसती खात्रीच नाही तर ती सीरियल कशी असेल, त्यांतल्या अभ्यासांत "कहानीमें ट्विस्ट" कसे असतील, जादूच्या खेळाइतकेच थक्क करू शकणारे गणिताचे खेळ त्यांत कसे टाकायचे इत्यादी विषयी माझे थोडे-थोडे लेखन, विचार आणि प्रयोगही चालू असतात. कधीतरी त्यावरही सविस्तर लिहायचे आहे.  

जबलपुरला खेळलेला एक खेळ छान लक्षांत राहून त्याचा आनंद इथे नमूद करवासा वाटतो. हा खेळ शिक्षकांनी आम्हा विद्यांर्थ्यांसाठी आयोजित केला होता. एका टेबलावर खूप निरनिराळ्या सुमारे पन्नास वस्तू मांडून ठेवत. आम्हाला डोळे झाकून तिथपर्यंत नेत-  दहापर्यंत आकडे मोजून तेवढा वेळच त्या वस्तू पाहू दिल्या जात आणि मग दुसरीकडे बसून पुढील अर्ध्या तासांत आम्ही आठवतील तेवढ्या गोष्टींचा यादी लिहून काढायची. यामुळे स्मरणशक्ति वाढायला तसेच फोकस करायला मदत होते. तसेच मला डोंबारी खेळांचे भयंकर आकर्षण होते. मला तसे खेळ शिकता आले नाही म्हणून आजही वैषम्य वाटते आणि इतके खेळगुण अंगांत असणा-या या कलावंतांना भारत सरकारच्या खेल-नीति मधे कोणतीही जागा नसल्याचा रागही येतो.    

आपण श्रीमंत नाही याची जाणीव व्हायला एक प्रसंग घडला. आम्हीं जबलपुरला आलेलो होतो. आता आईला सिनेमा बघायला घरच्यांची सोबत नव्हती.  पण शेजारच्या मैत्रिणींबरोबर विशेषतः बेहेरे-काकू आणि कमलापुरे-काकू यांच्या बरोबर ती जात असे. असाच एकदा त्यांचा कार्यक्रम ठरला पण नेमकं तेंव्हाच आमच्या शाळेच्या कुठल्याशा फंक्शनमधे स्टेजवरच्या कामांत माझी निवड झाली त्यासाठी नवा ड्रेस लागणार होता. रात्री सर्व निजानिज झाल्यावर आई-दादांचं थोडसं बोलण झालं की खर्चाची तोंडमिळवणी कशी करायची आणि मग आईने स्वतःचा सिनेमाचा बेत रद्द केला. मला अचानक जाग येऊन मी हे ऐकत होते, पण मी ऐकलं हे त्यांना जाणवू नये म्हणून मला गप्प बसणं भाग होतं. मला शाळेला नवा ड्रेस लागतो म्हणून आईला स्वतःच्या छोट्याशा करमणुकीला सुद्धा सोडावं लागलं ही बाब मनांत घर करून राहिली. 

सभाधीटपणा देखील मुलांना शाळेच्या वयांतच शिकवला पाहिजे. तो माझ्यांत नाही हे ही मला एका प्रसंगाने कळलं. शाळेत पंधरा ऑगस्टचा झेंडावंदनाचा कार्यक्रम होता आणि त्यानंतर विविध विषयांवर बोलण्यासाठी काही मुली-मुलांची निवड झाली होती. मला लोकमान्य टिळक हा विषय होता कारण एक ऑगस्टला त्यांची पुण्यतिथी असते. मी पण छानपैकी निबंध लिहून पाठ करून ठेवला. कार्यक्रमांत पहिल्या दोघांनंतर मला बोलायचे होते. पण इतका ताण आला, की मला एक अक्षर आठवेना. ज्या बाईंना आधी निबंध दाखवून झाला होता त्यांनी एक-दोन मुद्द्यांची आठवण करून दिली. मुख्याध्यापकांनी मधूनच सुरुवात कर अशीही परवानगी दिली पण माझ्या तोंडून अक्षरही फुटेना. पाच मिनिटे मला वेळ देऊन शेवटी मला बसायला सांगितले. मला कुणी रागावले नाही उलट "असं होतं कधीकधी पुढच्या वेळी पुन्हा प्रयत्न कर" अस मुख्याध्यापक म्हणाले. पण माझं हे स्टेजला घाबरणं पुढेही खूप काळ चालूच राहिलं. 

आमच्या घरांत वाचनाची चंगळ होती. दादांच्या संस्कृत-तत्वज्ञानाच्या डिग्रीमुळे महाभारत, रामायण, पुराणं, उपनिषदं, असे ग्रंथ भरलेले होते व त्यांतील सर्व गोष्टी आणि घटना आम्हीं वारंवार वाचून काढत असू.  मग मी महाभारतातल्या भीमाचा रोल स्वतःकडे घेऊन माझ्यांत किती ताकत आहे ते अजमावत असे. त्यासाठी धाकट्या भावाला पाठंगुळीशी घेऊन, बहीण आणि आत्याच्या मुलीला दोन उजव्या-डाव्या कडेवर घेऊन घरभर फिरत असे. मात्र धावपळीच्या खेळासाठी जेवढी चपळाई हवी त्यामधे मी कमी पडत असे. तिसरीत पहिली आल्याचे बक्षिस म्हणून अरेबियन नाइट्स हे पुस्तक मिळाले होते आणि चौथीनंतर माझ्यासाठी "चांदोबा" मासिकाची वर्गणी लावली होती. धाकट्या भावंडांचा अभ्यास घेण्याचे कामही मी घेतले. 

मी पाचवीत असतांना देशामधे मोजमापाची जुनी पद्धत जाऊन नवीन दशमान पद्धत लागू झाली आणि शेराऐवजी किलोग्राम तर मैलाऐवजी किलोमीटर हे मोजमाप आले. मात्र त्यांतील किलो या शब्दाचा अर्थ कुणीही नेमका समजाऊन न सांगितल्याने या दोन मापांमधे आम्हा विद्यार्थ्यांचा खूप गोंधळ होई. त्यांतच पूर्वीचे आणे-पैसे जाऊन त्यांच्या जागी सरळ शंभर पैशांचा एक रुपया असे गणित आले. मग जुन्या पैशाला पैसा आणि नव्या पैशाला खडकू ( लहान होता म्हणून) अशी बोली नांवे पडली. पाचवीच्या परीक्षेत अमुक आण्यांचे किती पैसे अशी गणितं येणार होती आणि ते शिकवण्याच्या काळांत माझी शाळा बुडालेली होती. परीक्षेच्या दोन मिनिटं आधी एका मैत्रिणिने फॉर्म्यूला सांगितला की दोन आण्यांच्या पुढे जेवढे आणे विचारतील त्यांना सहाने गुणून एक मिळवायचा. हा नियम सरसकट लावल्यामुळे माझी दोन गणितं चुकून दोन मार्क बुडाले त्याची रुखरुख मनाला खूप दिवस लागली होती. 

अशा प्रकारे माझ्यातील गुण-अवगुणांची जाणीव मला होऊ लागली होती. हिंदी भाषेवर प्रभुत्व येऊ लागले होते. त्याचबरोबर घरातील जबाबदारीची जाणीवही होऊ लागली होती. 

मग एक दिवस दादांना त्यांच्या शर्मा नामक सहाध्यायांचे पत्र आले. बिहार सरकारच्या अधिपत्याखालील "मिथिला संस्कृत रिसर्च इन्स्टिट्यूट दरभंगा" येथे प्रोफेसरांची पदे भरण्यासाठी अर्ज मागवले होते, त्यासाठी अर्ज पाठवण्याचा सल्ला होता. आधीच आम्ही महाराष्ट्रापासून दूर आलेलो. मग इतक्या लांबच्या गांवी नोकरी घ्यावी का? नाना म्हणाले हो,  तेंव्हा दादांनी आठवण करून दिली की पीएचडी नंतर दादांना कोलंबिया विद्यापीठाकडून संस्कृतच्या पोस्टवर काम करण्याची ऑफर आली होती. पण एकुलता एक मुलगा परदेशी गेला की तिकडचाच होऊन राहील म्हणून नानांनी नको म्हटले होते आणि दादांनीही त्यांच्या शब्दाला मान देऊन ती ऑफर सोडली होती. पण अर्थातच आताच्या ऑफर मधे खूप फरक होता. मुळांत ही नोकरी देशांतच असणार होती. जास्त अर्ज येणार नसल्याने जवळपास पक्की होती. सरकारी नोकरी असल्याने पगार कमी वाटत असला तरी पेंशन मिळणार होते. हे सर्व मुद्दे विचारांत घेऊन नानांनी त्यांना दरभंग्याला इंटरव्ह्यूसाठी जाण्यास सांगितले. एव्हाना त्यांचा आजार बळावला होता. तरीही, तिथे काही दिवस रहावे लागले तर माझ्या आजारपणाची काळजी करू नका, काम पूर्ण करून, निकाल ऐकून मगच या असेही दादांना बजावले. 

मला ते वीस-तीस दिवस नीट आठवतात. घरांत आम्ही चार मुलं - त्यांत मी मोठी म्हणजे नऊ वर्षांची. आईला चौथ्या बाळासाठी दिवस गेलेले. नानांचं आजारपण वाढत चाललेलं. माझी व बहिणीची वार्षिक परीक्षा तोंडावर आलेली. आणि दादांचा दरभंग्याला मुक्काम किमान पंधरा दिवस तरी असणार होता. मी जवळ जवळ रोजच आई व नानांच्या औषधासाठी आमचे फॅमिली डॉक्टर मांडवीकर यांच्याकडे जात असे. ते नानांच्या आजाराला एक तांबडं, थोडसं गोडसर औषध देत. बहुधा कफाचा त्रास कमी करण्यासाठी असावे. पण एक दिवस ते घरी आले आणि दादांना बोलावून घ्या म्हणाले.  नानांना ते पटले नाही. दरभंग्याचा इंटरव्ह्यू अजून व्हायचा होता. मग नानांनी त्यांच्या मोठ्या जावयाला बोलावण्याचे ठरवले. मला आठवते की मी एकाच दिवशी दोन तारा पाठवल्या होत्या. आतोबांना पाठवलेल्या तारेचा मजकूर होता की नानांची तब्येत चांगली नाही, असाल तसे तातडीने या. आणि दादांना मजकूर होता की नाना ठीक आहेत, निर्धास्तपणे इंटरव्ह्यू देऊन निकाल आल्यावर जॉइन होऊन मगच या. एवढे सगळे निर्णय नाना शांत चित्ताने घेत होते. 

आतोबा आले त्यानंतर नानांची तब्येत झपाट्याने घसरली, किंबहुना तसे होणार म्हणूनच त्यांना बोलावले होते. दादांची निवड झाल्याची तार आली, पाठोपाठ त्यांनी नोकरीत आठवडाभर काम करून मगच सुट्टी घ्यावी  असा डायरेक्टरांचा सल्ला आहे, शिवाय घर बघावे लागणार आहे, तरी नाना कसे आहेत ते कळवा अशीही तार आली. त्यालाही नानांनी सांगितल्या बरहुकूम मीच तार पाठवली होती की सर्व कामे आटोपून मगच या. 

आणि मग नाना अशी गोष्ट बोलले जिने आजतागायत माझ्या विचारांना खूप भंडावले आहे. त्यांनी आईला सांगितले की लौकरच अमुक दिवशी हनुमान जयंती आहे - चांगला मुहूर्त आहे, त्या दिवशी मी प्राण सोडीन. मी पण हे ऐकले. मात्र महाभारतातील भीष्मकथा माहीत असल्याने मला या वाक्याचे तेंव्हा खूप आश्चर्य वाटले नाही. कोणालाही इच्छामरण असू शकते असेच मला वाटले. तोपर्यंत मी कोणाचेही मरण पाहिलेले नव्हते त्यामुळे त्याचे गांभीर्यही वाटले नाही. त्या दिवशी दादा घरी नसतील, त्यांच्या परत येण्याला अजून काही दिवस अवकाश असेल, पण त्यांना डिस्टर्ब करू नका, जावयाने मुखाग्नि देऊन चालतो असे नानांनी बजाऊन सांगितले. पुढे आईला असाही सल्ला दिला कि आता तुम्हीं बिहारमधे जात आहात तर माझं पहिलं श्राद्ध गया येथे जाऊन करा म्हणजे दरवर्षी तुम्हाला वर्षश्राद्ध करावं लागणार नाही. 

आणि तीन चार दिवसांनी जेंव्हा हनुमान जयंतीचा दिवस उजाडला तेंव्हा त्यांनी आतोबांकडून छोटीशी आंघोळ घालून घेतली, आईला थोडी खीर करायला सांगितली- नैवेद्य दाखवून खीर खाल्ली. मग कॉटवरून खाली येऊन चटई घालून झोपले. एक-दीडच्या सुमारास मुलांना खेळायला बाहेर पाठव असं आईला सांगितल्यावरून आम्ही सर्व शेजारी पोहनकरांकडे गेलो. चारच्या सुमारास आईने बोलावले- की नाना वारले आहेत, दादांना तार करून ये.

 हा प्रसंग माझ्या मनावर ठसलेला आहे. हे निव्वळ शांत मरण नव्हतं तर पूर्ण जाणीवेच्या अवस्थेतील मरण होतं असं मला वाटतं. हे त्यांनी कसं साधलं याचं आश्चर्य अजून जात नाही- उलट माझी प्रबळ इच्छा आहे की माझं मरण देखील असच असावं. पूर्ण जाणीव ठेऊन- रागद्वेष मनांत न रहाता- समाधानाने- आणि माझं मी ठरवून. पण हे कसं साध्य करतात? 

असो. तार मिळाल्यावर मिळेल ती पहिली गाडी पकडून जबलपुरला येण्यासही दादांना चार दिवस लागलेच. तोपर्यंत नानांचे विधी थांबवले नव्हते, त्यांची सूचनाच तशी होती. शेवटचे दर्शन न झाल्याने दादांना खूप हळहळ तर वाटलीच. आधी त्यांनी यासाठी आईला जबाबदार मानलं, पण आमचे घरमालक डॉ बाजपेयी, आतोबा आणि डॉ. मांडवीकरांनी त्यांची समजूत काढली. 

या प्रसंगानंतर काही दिवसातच आम्ही दरभंगा येथे दाखल झालो. यथावकाश सर्वजण गयेला जाऊन नानांच श्राद्ध केलं. नानांचं पर्व आयुष्यातून संपलं. धाकट्या भावंडांना त्यांचा सहवास फारसा लाभला नव्हता. मला मात्र त्यांनी गणित या विषयाकडे एका दार्शनिक दृष्टिने पहायला शिकवलं. त्यातला आनंद मला समजला आणि आयुष्यभर पुरतोय. हे मोठं संचितच मला वारसाहक्काने मिळालं.  मरणाच्या बाबतीतही तसं मिळालं पाहिजे अशी माझी आंतरिक ओढ कायम राहील.

-----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment