मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Saturday, March 10, 2012

4/ मराठी बालसाहित्य कुठे आहे, कुठे जायला हवे


मराठी बालसाहित्य - कुठे आहे, कुठे जायला हवे.
महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षी मराठी महाराष्ट्राचा विचार विविध अंगांनी होत आहे. त्यांतला एक महत्त्वाचा द्दा म्हणजे बालसाहित्य. पण अजून तरी याचा विचार कुणी केलेला दिसत नाही.
साने गुरूजींनी म्हटले होते - करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे. बालसाहित्याबद्दल एवढे व्यापक आणि निर्णायक विधान दुसरे कुणीच केले नसेल. बालसाहित्याचा विचार फक्त 'बालकांसाठी साहित्य' या दृष्टिकोनातून होऊ शकत नाही तर उद्याचा समाज, राष्ट्र आणि जग कसे असेल किंवा कसे असायला हवे, त्याचे प्रतिबिंब आजच्या बालसाहित्यातून दिसत असल्याने बालसाहित्याचा विचार अत्यंत दूरदृष्टीने केला पाहिजे.
मला चवथी पास झाल्यावर बक्षीस म्हणून अरेबियन नाईट्स हे पुस्तक वाचायला देण्यात आले आणि पाचवतर माझ्यासाठी चांदोबा मासिकाची वर्गणी लावण्यात आली. याशिवाय वडील संस्कृत तत्त्वज्ञानाचे प्रोफेसर आणि रिसर्च गाइड असल्याने घरात महाभारत, रामायण, पुराण, उपनिषदे आदी पुस्तकांची रेलचेल होती त्याच पुस्तकांच्या मुलांसाठी काढलेल्या आवृत्या पण आम्ही विकत घेत गेलो. चांदोबामध्ये ही महाकाव्ये अखंड वाचायला मिळत असत. वडील नोकरीसाठी बिहारमध्ये आले आणि आम्ही दर उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी खानदेशात येऊ लागलो. त्यामुळे इथली चुलत-मावस भावंडांची शाळेची पुस्तके हे आम्हांला 'साहित्य' होते. मग तो भूगोलाचा धडा का असेना ! आम्ही मोठे होत गेलो, तसे घरात लहान मुलांची भरपूर हिंदी मासिकेपण सुरू केली गेली पराग, बालक, मनमोहन... ती आता कालौघांत संपलेली आहेत. अमर चित्र कथा ही एक मोठी देणगीच होती.
ही मासिके संस्कार करत का? याचे एक उदाहरण मी देऊ शकते. 'पराग'मध्ये एक किशोर कादंबरी क्रमशः छापली गेली होती. शाळेतील सहा मुली-मुलांचे टोळके छोट्या छोट्या बाबतीत हेरगिरी करीत असे. एका लंगड्या भासणाऱ्या माणसाचा पाठलाग करताना त्यांना एक मोठ्या कटाचा सुगावा लागतो. शहरात एका शाळेतील मुली मुलांची क्रिकेट मॅच होणार असते आणि त्यात काहीतरी अत्यंत आनंदाश्चर्यजनक होणार आहे, 'वाट पाहा,' अशा घोषणा होत असतात. कटाचा माग काढताना त्याची तारीख आणि क्रिकेट मॅचची तारीख एकच असल्याचे मुलांच्या लक्षात येते. यातली एक मोठी मुलगी आणि एक मुलगा क्रिकेट खेळणाऱ्या गटात पण असतात. आयत्या दिवशी घोषणा होते 'चाचा नेहरू बक्षिस द्यायला येणार आहेत.' मग दुसरी धक्कादायक घोषणा - 'चाचा नेहरूपण स्वतः चार ओव्हर्स खेळणार आहेत.' नेहरू खेळात उतरल्यावर हेरगिरी गटामधली मुलगी खेळात हळूच त्यांना कुजबुजून कटाची माहिती देते. मग कट करणारे पकडले जातात.
या एका कथानकाने काय काय नाही सांगितले ? गुप्तहेरगिरी या करिअरबद्दल औत्सुक्य, मुली आणि मुलांना एकत्रपणे एका टीममध्ये क्रिकेट खेळता येते हा स्त्री-पुरूष समानतेचा विचारकी ज्याच्या अभावाने आज स्त्रीभ्रूणहत्या ही भेदक समस्या झाली आहे. आणि भारताचे पंतप्रधान थोडावेळ का होईना, शाळकरी मुलांमध्ये मूल होऊन खेळायला येतात, या मागची मोठी लोकतांत्रिक प्रेरणा....!
म्हणूनच की काय, आज वयाच्या साठव्या वर्षीदेखील घरात माझ्या वाचनासाठी चार बालमासिके येतात आणि ती मी वाचते ( ती दहा मिनिटात संपत असली तरी). माझ्यावर ज्या बालसाहित्याने प्रभाव टाकला त्याची एक मोठी यादीच होईल. महाभारत, रामायण, पुराणे, उपनिषदे (काही), भागवत, दुर्गा-सप्तशती, व्रत-सणांच्या गोष्टी, शिवलीलामृत हे ग्रंथ मी आधी बालवाड्मय म्हणून वाचले. पंचतंत्र, अरेबियन नाइट्स, इसापच्या गोष्टी, अँडरसनच्या परीकथा, दशकुमार चरित्र, क्रांतिवीरांच्या कथा, सर्व तऱ्हेचा इतिहास, शिवाजी, पेशवाई, मुगल, ब्रिटिश, अरेबिया, पहिले-दुसरे महायुद्ध, अमेरिकन गृहयुद्ध, फ्रेें, अमेरिकन, रशियन चिनी क्रांत्या, सिंकंदर, चंद्रगुप्त, चाणक्य, विक्रमादित्य, चालुक्य, हर्ष, पुलकेशी, राजपुताना हे सर्व वाड्मय म्हणूनच वाचले इतिहास म्हणून नाही. तेव्हा नव्हते जाणवले, पण आता वाटते, की विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ज्यांनी बालसाहित्यात मोठी कामगिरी केली, त्यांचा कोशही प्रसिद्धिस यावा. त्यामध्ये रवींद्रनाथ ठाकूर, साने गुरूजी, चक्रपाणी बालशौरी रेड्डी (चौदा भाषांमधून निघणाऱ्या चांदोबा मासिकाचे संपादक) , अनंत पै (अमर चित्र कथा मासिकाचे जनक) हरिकृष्ण देवसरे ('पराग' चे संपादक) , आचार्य अत्रे आदींचे मोठे योगदान आहे. अत्रे यांनी संपादित केलेली शाळेच्या पहिली ते अकरावीच्या मराठी पुस्तकांची मंगलवाचन माला आजही अजोड वाटते. त्यातले कित्येक धडे प्रसंग मराठी भाषेची लेणी होऊन बसले आहेत. मी खीर खाल्ली तर बुड घागरी, दिनूच्या आईचे बिल, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा, विसराळू विनू, पंत मेले राव चढले ही नाट्यछटा या सर्वांमध्ये अंतर्मुख करण्याचे सामर्थ होते. त्यांनी एक आयकॉनिक ल्य मिळवले होते. या यादीत अर्नाळकरांचा गुप्तहेर छोटूपण आहे, भा. रा. भागवतांचा फास्टर फेणे आहे, टिल्लू आहे, चिंगी आहे आणि दिलीप प्रभावळकरांचा बोक्यापण आहे. मात्र आज त्या धतींचे साहित्य हरवल्यासारखे वाटते.
बालसाहित्य कशाला म्हणायचे? त्यात रंजकता असली पाहिजे एवढा निकष साने गुरूजींनी सांगून ठेवला. मला वाटते तेवढाच पुरेसा आहे. इतरांना मात्र वाटते बालसाहित्यात हे असू नये, ते असू नये. उदाहरणार्थ, इकॉनॉमिक्स, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, अणुबाँब, तत्त्वज्ञान हे विषय बालसाहित्य असू शकत नाहीत अस आपल्याकडी खूप लेखक, प्रकाशक आणि शिक्षणतज्ज्ञाचा समज आहे. मला हे पटत नाही. याचे कारण मी इंग्लिशमध्ये लेडी बर्ड या प्रकाशन संस्थेची पुस्तके पाहिली आहेत. त्यांनी आठ वर्षांखालील मुलांची, पंधरा वर्षांखालील मुलांची आणि त्याहून मोठ्या मुलांची अशा तीन वर्गवारींमध्ये पुस्तके काढली आहेत. मुख्य म्हणजे यात कोणताही विषय बाजूला ठेवलेला नाही. त्यांच्या प्रकाशनातील पहिल्या आणि दुसऱ्या गटाच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकांवरून मी इकॉनॉमिक्स हा विषय शिकले. एवढेच नव्हे तर, एक विषय लहान मुलांना, किशोरांना आणि तरूणांना वेगळा कसा शिकवायचा आणि वेगळा का शिकवायचा हे पण कळले. त्याचप्रमाणे साहित्य म्हणजे फक्त ललित एवढीच मर्यादित व्याख्या नाही हे पण पटले.
आधुनिकता आली तसे साहित्यप्रकारही बदलले - खेळ, गाणी, सिनेमे, व्हिडिओ गेम्स हे मनोरंजनाचे नवे आयाम समोर आले. पण यांची दखल घेण्यात आपण आपल्या संकुचित व्याख्येमुळे मागे पडलो. या आधुनिक प्रकारांना साहित्याची जोड मिळाली, तर त्यातून उत्तम बालशिक्षण होते. माझ्या लेखी लहानपणी वाचलेले जादूगार रघुवीर यांचे 'पत्त्यांची पोतडी' हे पत्त्यांच्या जादू शिकवणारे पुस्तक अप्रतिम बालसाहित्य आहे. त्यातल्या कित्येक जादू मी अजून करते व लहान मुलांना शिकवते. अरविंद गुप्ता यांचे टाकाऊ क्षुल्लक गोष्टतून खेळणी निर्माण करण्याचे तंत्र, इकेबाना स्टाइलची पुष्प-रचना किंवा कागद कारतण्याची कला हे मला उत्कृष्ट बालसाहित्यच वाटते. कुणी तरी बडबड गीते एकत्रित करून, त्यांना छान चाली लावून त्या गाण्यांचा अल्बम काढला - व्हिडिओ चित्रफिती बनवल्या. वसंत देसाईनी 'बालभारती' मधील सर्व कवितांना चाली लावून महाराष्ट्रभर त्या कविता एकाच ताला-सुरात म्हणता येतील अशी सोय केली. या सर्वांचे योगदान अति मोलाचे आहे, पण बालसाहित्य म्हणून या प्रयोगांची दखल घेतली जात नाही.
अलीकडच्या काळात जयंत नारळीकरांनी काही प्रमाणात बालवाङ्म आणि बाळ फोंडके यांनी किशोरवाङ्म लिहिले. पण ते विज्ञान-वाड्मय की बाल-वाड्मय? त्यांना काय लेबल लावायचे या वादातच मंडळी अडकली. पण त्यांना दोन्ही लेबले लावून, दोन्हींबद्दल त्यांचे अभिनंदन करायला काय हरकत आहे ?
'एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका'च्या धर्तीवर महादेवशास्त्री जोशी यांनी चार खंडात मुलांचा 'संस्कृती कोश' संपादित करून प्रकाशित केला, त्याबद्दल त्यांना पद्मपुरस्कार, महाराष्ट्र-भूषण किंवा पुण्यभूषण का नाही मिळाले? मी स्वतः पक्षनिरीक्षण, अणुविज्ञान, आकाशदर्शन या विषयांवर लिहलेली स्फुटे बालवाङ्मयात मोडली जात नाहीत- ती रंजक असली तरी.
आपल्याला उद्याचा महाराष्ट्र कसा हवा आहे - 'इंडिया' विरूद्ध 'भारत' असा दुभंगलेला हवा का ? जो इंडियाच्या लींगमध्ये असेल तो फाडफाड इंग्रजी बोलणारा, मराठीतून विचार मांडता येणारा, श्रीमंत,फक्त एसी गांड्यांमधून फिरणारा असा असेल - तो वैज्ञानिक, तंत्रज्ञ, हाय प्रोफेशनल, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, मॅनेजमेंट तज्ज्ञ असा असेल. पण दुसरीकडे जो भारताच्या गटात उभा आहे तो गरीब, आठवीच्या पुढे शाळेत जाऊ शकलेला, शेतात किंवा गावात किंवा शहरात राबराब राबणारा, मराठी बोलणारा असेल आणि या दोघांचे एकमेकांशी काही देणे-घेणे नसेल असा महाराष्ट्र आपल्याला हवा आहे का ? तसा नको असेल तर सर्वप्रथम रंजक पण सर्वसमावेशक अशा मराठी बालसाहित्याची निर्मिती व्हायला हवी. संगणक आज गावागावांत आणि शाळाशाळांत पोचत आहे तर संगणकावर सर्वप्रथम इन्स्क्रिप्ट या अती सोप्या पद्धतीने मराठी टंकलेखन शिकण्याची सोय हवी.आज पोगो, हंगामा यांसारखे टी.व्ही. चॅनेल्स मुलांसाठी चोवीस तास कार्यक्रम राबवतात. पण ते इंग्रजी, पाश्चात्त्य संस्कृतीत मुरलेले असे म्हणजे 'इंडिया'साठी उत्तम आणि रंजक कार्यक्रम त्यात असतात. हे आपल्या चॅनेल्सवर मराठीत यायला काय हरकत आहे ?
मी क्रेंद्रशासनाच्या पेट्रोलियम कनझर्व्हेशन रिसर्च असोसिएशन या विभागाचा कारभार पाहत असताना आम्ही शाळकरी मुलांना डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम राबवले. त्यांची थोडी चर्चा करणे मला आवश्यक वाटते. आम्ही एक साप्ताहिक रेडिओ कार्यक्रम करत होतो-- बूंद-बूंद की बात. यामध्ये पेट्रो अंकल आणि त्याचे तीन बालमित्र गप्पा आणि नाट्यसंवादाच्या रूपाने इंधनाचा प्रत्येक थेंब कसा योग्य प्रकारे वापरावा - अपव्यय कसा टाळावा, पर्यावरण कसे रक्षावे ही चर्चा करीत असत. हा कार्यक्रम विविधभारती चॅनेलवर २५० आठवडे चालला. हिंदीखेरीज तमिळ, तेलगू, मल्याळम्, कन्नड, असामी, बंगाली पंजाबी अशा सात भाषांमध्ये अनुवाद करून मारे पन्नास आकाशवाणी क्रेद्रांवर हा क्रार्यक्रम ऐकला जात असे. यातली वीस कथानके आम्ही पुस्तक रूपाने छापली त्यातले दोन भाग दिल्लीच्या दोन शाळांमध्ये नाट्यरूपाने सादर केले गेले. आयायटी दिल्लीने विज्ञानसाहित्य म्हणून हे पुस्तक विकत घेतले. या पुस्तकाची तमिळ तेलुगूमध्ये पांडुलिपी पण तयार झाली.
दुसरा प्रयोग होता 'दूरदर्शन'वर साप्ताहिक कार्यक्रम खेल खेल में बदलो दुनिया. हा पण सुमारे १७० आठवडे चालला. यामध्ये देशभरातील शाळांकॉलेजांची मुले स्वतः नाट्यप्रसंग लिहून आणत आणि पर्यावरण आणि ऊर्जा संरक्षणावर कार्यक्रम सादर करीत. शिवाय तीच मुले प्रश्नोत्तरे, क्विझ यांतून आपली र्यावरणाविषयीची जागरूकता दाखवून देत. माझ्या मते हे सर्व उत्तम बालसाहित्यात मोडते.
याशिवाय, आम्ही काही बाल-मासिकांना वार्षिक करारने एक पान जाहिरात देत असू. यातही जाहिरातीची मांडणी एखाद्या ऊर्जा संरक्षक गोष्टीच्या स्वरूपाची असायची.
या तीनही कार्यक्रमांना लहान, शाळकरी मुलांचा प्रतिसाद भरपूर होता आमच्याकडे महिन्याभरात दहा-पंधरा हजार पत्रे, इमेल किंवा एस.एम.एस. येत असत. मात्र शासनातील सर्वच विभागांकडून सूर लावला जायचा - तुम्ही ऊर्जा संरक्षणाचा विषय हाताळा, मुलांचे विषय महिला-बाल-कल्याण खात्याला हातळू द्या. जणू काही बालकांना उर्जा संरक्षणाचे देणे-घेणेच नाही. पण शासनाबाहेरच्या समाजातही बालसाहित्य म्हणजे काय हे ठरवताना आपण तसाच दुभंगलेपणा दाखवत नाही का ? माझी बदली झाल्यावर पुढील अधिकाऱ्यांनी नेमका हाच मुद्दा घेऊन, 'आपला मुलांचा संबंध काय' असा प्रश्न विचारीत हे कार्यक्रम बंद केले.
बाल-साहित्यात ललित, विज्ञान, शालेय असे भेदाभेद करता मराठी आणि मुलांना रंजक हे दोनच निकष ठरवून त्या साहित्याची दखल, नोंद प्रोत्साहन हे केले गेले पाहिजे. स्वतः साहित्यनिर्मिती करता आली नाही, तरी रत्नपारखीपणा आपल्याला नक्कीच येऊ शकतो, तो तरी आणावा व जपावा.


लीना मेहेंदळे, भा.प्र.से.