मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Sunday, June 2, 2024

1. मसूरीला आयएएस ट्रेनिंगच्या दिशेने - लेखमाला मिळून साऱ्याजणी

अजून चालायचेच आहे

आयुष्य म्हणजे एक मोठा प्रवास. त्यात सुखदुःख, आशानिराशा, ऊनपाऊस असे रंग असणारच. ते जगणे आणि तरीही अलिप्ततेने पहाणे! पण अगदीच अलिप्तही नाही कारण समाज सद्गुणी झाला पाहिजे, व राष्ट्र समृद्ध झाले पाहिजे ही आस असेल तर आयुष्याला अजून एक गहिरा रंग मिळतो. अशा सर्व रंगांचे हे प्रकटन ! किती जमते ते पहायचे.


मसूरीला आयएएस ट्रेनिंगच्या दिशेने

-- लीना मेहेंदळे 9869039054


लखनऊ स्टेशन वरील ती दुपार माझ्या मनःपटलावर कायमपणे कोरली गेलेली आहे. दिनांक असावा 11 जुलै 1974. लखनऊचा भलामोठा, लांबलचक प्लॅटफॉर्म. बेसुमार गर्दी. धावत पळत जाणारे लोक - त्या गर्दीत मी पण एक होतेच.

लखनऊ दिल्ली गाडी येण्याची वेळ झालेली होती. मला हीच गाडी पकडायची होती. माझं सामान ज्या कुलीकडे होतं त्याला मी आधीच सांगून ठेवलेलं होतं की बघ बाबा, मला बायकांच्या डब्यात बसव. थोडासा प्रौढ, म्हातारपणाकडे झुकलेला असतो होता. त्याच्या डोक्यावर माझं सामान म्हणजे डोक्यावर एक होल्डॉल, दोन सुटकेसेस आणि खांद्याला एक शोल्डरबॅग. माझ्याजवळ देखील एक सुटके, एक जेवणाचं सामान ठेवलेली शोल्डरबॅग आणि एक टिपिकल, मोठीथोरली पर्स इतकं सामान होतं. इतकं समान यासाठी कि त्याच्या आधारे मला पुढील संपूर्ण एक वर्ष ट्रेनिंग साठी मसुरी काढायचं होतं. त्यामुळे साड्या, ड्रेसेस, रजाई, गरम कपडे, पुस्तक, चपला-बूट, दागिने, काही दिवस तरी पुरतील इतके फराळाचे पदार्थ, अजून काही सामान इत्यादी इत्यादी सर्व होते.

अचानक गर्दीतून कोणीतरी सांगितलं की लखनऊ- दिल्ली ट्रेन तर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर येते आहे. त्याबरोबर ज्यांना ती गाडी पकडायची होती अशी सगळी गर्दी धावत पळत जिने चढायला लागली. मी पण त्यांच्याबरोबर जिना चढले. आणि पलीकडील जिना उतरताना माझ्यासमोरच गाडीने प्रवेश केला, तिचा वेग कमी झाला आणि गाडी थांबली. इंजिनच्या जवळ मला एक महिलांचा डबा दिसला होता. तिकडे धावत पळत जाऊन मी आत शिरले, एक खिडकी पकडली, माझ्या हातातलं मान बाकाखाली ठेवलं. तोपर्यंत माझ्या मागून बरीच गर्दी त्या डब्यामध्ये शिरली होती. बायकांचा डबा असला तरी त्यांना पोचवण्यासाठी आलेले इतर पुरुष, कुली वगैरे. क्षणातच डबा खचाखच भरला होता. आता माझ्या लक्षात आलं की अरे, माझा कुली कुठे आहे आणि माझं सामान कुठे आहे?

मी खिडकीतून डोकं बाहेर काढून पाहायचा प्रयत्न केला. त्याकाळी खिडक्यांना आडवे गज नसत. पूर्ण खिडकी मोकळी असायची. एका परीने हे सोय होती, कारण लोक त्या खिडकीमधून सामान टाकू शकत होते किंवा बाहेर काढू शकत होते. अगदी लहान मुलं देखील त्या खिडकीवाटे आत-बाहेर करू शकत असत. अशी ती बिनगजांची खिडकी असल्यामुळे मला डोकं बरंच लांब बाहेर काढता येत होतं आणि प्लॅटफॉर्मवर लांब पर्यंत माझी नजर जाऊ शकत होती. पण कुली दिसायचं काही चिन्ह नव्हतं. गाडीला हिरव्या लालच्या ऐवजी पिवळा सिग्नल मिळाला. एखादी शिट्टी पण वाजली. गार्ड आणि टीसीच्या फेऱ्या आणि लगबग सुरू झाली. गाडी आता थोड्या वेळातच सुटणार.

मला समजेना की मी थांबू की उतरू? तस म्हटलं तर उतरण्यासाठी एवढ्या गर्दीला तुडवून मी दारापर्यंत कशी पोहोचणार होते? शिवाय माझं जे समान मी बाकांखाली सरकवलेलं होतं त्याच्या आजूबाजूला इतरां बर सामान कोंबलेलं होतं. म्हणजे हा खटाटो फारच मोठा होता. पण माझे बाकी समान नसेल तर मी गाडीत थांबून किंवा दिल्लीला जाऊन तरी काय करू अशा धाकधुकीत मी असतानाच अगदी लांबून स्टेशनच्या दुसऱ्या बाजूने तो पळत येताना मला दिसला. त्यानी जेमतेम डबा गाठला आणि एक एक करून समान खिडकीतूनच आ दिल. इतरांनी मदत केली. माझं सगळं समान आत आलं तोपर्यंत गाडी सुरू झाली होती. मी पर्समधून ठरलेले पैसे काढले आणि त्याच्या हातात दिले. त्यानेही जास्त मागितले नाहीत. हा संबंध वेळ तो मला रागवत होता - त्याच्या प्रौढ वयाचा तो फायदा घेत होता म्हणा. "बीबीजी, मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या पाठी पाठी या, इकडे तिकडे जाऊ नका. तिकडे जो शेवटी महिलांचा डबा आहे तिथे मी गेलो. तुम्ही दिसला नाही पुन्हा सगळं सामान बाहेर काढलं आणि तुम्हाला शोधत आलो" वगैरे वगैरे. मी त्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेत होते. माझा जीव भांड्यात पडलेला होता कारण माझं सामान मिळालेलं होतं.

गाडी प्लॅटफॉर्मवरून पुढे सरकली, तो दिसेनासे झाला तरी खूप वेळपर्यंत मी तिकडेच बघत होते. मी जणू भानावर नव्हते. हा जर माझ्यापर्यंत पोहोचू शकला नसता तर? किंवा जर त्याने माझं सामान घेऊन पळून जायचं ठरवलं असतं तर? पण माझ्या लक्षात आलं की भारतीय समाजात जो एक सचोटीचा आणि इमानदारीचा गुण भरून राहिलेला आहे त्या गुणामुळे आज माझं रक्षण झालं होतं. माझं सामान वेळेत मला मिळणं याचं महत्त्व जसं मला वाटत होतं, तसं त्या म्हाताऱ्या कुलीलाही त्याच्या संस्कारांमुळे वाटत होतं. म्हणून त्याने एवढी धावपळ करून माझं सामान माझ्यापर्यंत पोहोचवलं होतं. अशी सचोटीची मानसिकता जर समाजात नसेल तर माझ्यासारख्यांचं कसं होणार? समाजात सज्जनता आहे म्हणूनच माझ्यासारख्या थोड्याशा बिनधास्त किंवा निष्काळजी लोकांचं निभावू शकतं. हे किती मोठं सुरक्षा कवच आपल्याला लाभलेले आहे. हे आपल्याला असंच वारंवार लाभलेलं राहावं, इतरांनाही लाभलेलं राहावं, यासाठी समाजातील सचोटी, सदाचार, आणि सदभावना कायम वाढत राहिले पाहिजे. त्यात मी किती भर घालू शके हे माहीत नाही. पण जोपर्यंत ही सचोटी आणि सद्भावना समाजात टिकून आहे तोपर्यंत माझ्यासारख्या व्यक्तींच्या अशा छोट्या मोठ्या चुकांना क्षमा आहे.

अशाप्रकारे बराच काळ समाजाच्या सद्भावनेचे परिशीलन आणि विचारमंथन करून झाल्यानंतर मग मी थोडीशी भानावर आले आणि गेल्या चार-पाच महिन्यांचा एक चित्रपट माझ्या डोळ्यासमोर सरकू लागला. याची सुरुवात म्हटलं तर जानेवारी 1974 मध्ये कधीतरी झाली. त्या दिवशी माझा आयएस च्या लेखी परीक्षेचा निकाल लागून मी त्यामध्ये उत्तीर्ण आहे असे कळले होते. आता एप्रिल महिन्यापर्यंत कधीतरी मौखिक इंटरव्यू होणार आणि त्यानंतर सिलेक्शन झाल्यास जुलै मध्ये एक वर्षाच्या ट्रेनिंग साठी मसुरीला जावं लागणार एवढी माहिती होती. साधारण त्याच सुमारास माझ्या लग्नाच्या गोष्टी सुरू होऊन लग्न ठरलं देखील. मे महिन्यात लग्न करायचं ठरल्यावर मी पुन्हा एकदा पटना येथे माझ्या पीएचडीच्या कामासाठी परत गेले आणि श्री प्रकाशराव कलकत्ता येथे त्यांच्या फिलिप्स मधील नोकरीत हजर झाले.

आम्हाला कुणालाच आयएएस ची नोकरी म्हणजे नेमकं काय असतं याची फारशी कल्पना नव्हती. मात्र एखादं राज्य काडर म्हणून अलॉट केलं जातं एवढी माहिती होती. माझे भावी सासू-सासरे यांनी तू आयएएस झालीस आणि महाराष्ट्रात आलीस तर आम्हाला फार आनंद होईल असं सांगितलं होतं. लग्नानंतर खूप महिन्यांनी एकदा माझ्या सासूबाईंनी गुपित उघड केलं की लग्न ठरल्यापासून तर प्रत्यक्ष मी मसुरीला जाईपर्यंत मला या परीक्षेत यश मिळून आयएएस ची नोकरी मिळावी यासाठी माझ्या सासऱ्यांनी गुरुवारचे उपास धरले होते. तसंच इकडे माझ्या आईने देखील शनिवारचा उपास धरलेला होता. शी कित्येकांची पुण्याई म्हणूया आणि माझे जे काही झाले असतील ते प्रयत्न म्हणूया. एप्रिल महिन्यात माझा इंटरव्यू बऱ्यापैकी झाला आणि जूनच्या शेवटी कधीतरी मी यएए मध्ये उत्तीर्ण झाले आहे अशी बातमी कळली.

माझे जन्मगांव धरणगाव, जिल्हा जळगांव. तिथून माझे वडील नोकरीनिमित्त बिहारमधे गेले असल्याने माझं शिक्षण बिहारमधून झालेलं, व आयएएसची परीक्षा देखील मी पटना सेंटरमधून दिली होती. त्या काळी महाराष्ट्रातून फार कमी मंडळी या परीक्षेला बसत आणि एकूण देशातच मुलींनी आयएएस मधे येण्याचं प्रमाण खूप कमी होतं. जळगाव जिल्ह्यातून ही परीक्षा उत्तीर्ण होणारी मीच पहिली कॅंडिडेट होते. निकाल लागला तेंव्हा महाराष्ट्रात महसूल मंत्री असलेले श्री मधुकरराव चौधरी यांनी माझ्या वडिलांचा पत्ता शोधून दरभंगा येथे टेलिग्राम पाठवला होता आणि आपली खानदेशी मुलगी यएए मध्ये आली आहे याचा आनंद व्यक्त करत माझ्या वडिलांचे अभिनंदन केले होते. तो गुलाबी रंगाचा छोटासा टेलिग्रामचा कागद माझ्या वडिलांनी पुढे कित्येक वर्ष जपून ठेवलेला होता आमचं लग्न मे महिन्यामध्ये झालं तोपर्यंत निकाल लागलेला नव्हता. लग्नानंतर आम्ही दोघं कलकत्ता येथे गेलो. तिथल्या महाराष्ट्र मंडळात माझ्या ओळखीपाळखी, खरेदी इत्यादि सुरू असतानाच मी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची बातमी समजली. मग मात्र माझी धावाधाव सुरू झाली. कारण मला आई-वडिलांकडे दरभंगा येथे जाणं गरजेचं होतं. माझं बरंसं सामान तिथूनच घ्यायचं होतं. पटना येथे जाऊन युनिव्हर्सिटीतील बरेच कागदपत्रांची पूर्तता करायची, हॉस्टेलमधलं माझं सामान गुंडाळून दरभंगा येथे आणून ठेवायचं, त्यातील मसुरी साठी लागणारे सामान निवडायचं, बँक अकाउंट बंद करायचे इत्यादी कित्येक लहानसहान गोष्टी होत्या. अध्यापक व मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी होत्या. मी लगबगीने कलकत्त्याहून पटना येथे आले. तिथेच मी फिजिक्समधे एमएससी पूर्ण करून पीएचडीसाठी रजिस्ट्रेशन करून प्रयोगांना सुरुवात केली होती. मायक्रोवेव्ह प्रोपोगेशन थ्रू मेटल-ब्लेंडेड ग्लासेस असा माझा विषय होता. तसेच मगध महिला कॉलेज इथे फिजिक्स विषयात लेक्चरर म्हणून काम करत होते. त्याच कॉलेजच्या लेडीज होस्टेलला मी असिस्टंट रेक्टर म्हणूनही काम पाहत होते त्यामुळे माझे निम्मे समान त्या हॉस्टेलला तर निम्मे समान पटना युनिव्हर्सिटीच्या माझ्या होस्टेलमध्ये जिथे मी 1968 पासून वास्तव्य केलेले होते. आता मला पटना युनिव्हर्सिटी मधून पीएचडी साठी केलेले रजिस्ट्रेशन रद्द करून घेऊन त्यांचे नो ऑब्जेक्शन घ्यायचे होते. एका बाबतीत त्यांचा दिलखुलासपणा व दूरदर्शीपणा म्हणावा लागेल. मला भारतातील अशा कित्येक संस्था माहित आहेत की त्यांची स्कॉलरशिप दिली जात असेल तर अशा प्रकारे मध्येच आपले पीएचडीचे काम सोडून जाताना आधी उचललेली स्कॉलरशिप ची रक्कम परत करावी लागते. पटना युनिव्हर्सिटी मध्येही इतर सर्व प्रकारच्या नोकऱ्यांसाठी हा नियम लागू होता मात्र त्यांनी विचारपूर्वक यूपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा अपवाद केला होता की ती परीक्षा पास झाल्यास व पीएचडीचे काम सोडून तुम्हाला त्या नोकरीत जायचे असल्यास दिलेली स्कॉलरशिप परत न घेता तुम्हाला पीएचडीचे काम थांबवण्याची रीतसर परवानगी पटना युनिव्हर्सिटी देत असे. त्याचा फायदा फक्त मलाच असं नाही तर त्याच वर्षी माझ्याबरोबर उत्तीर्ण झालेल्या अजूनही दोन-तीन विद्यार्थ्यांना मिळाला होता. पटना युनिव्हर्सिटीच्या मते त्या युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आयएएस मध्ये येणं हा एक मानाचा विषय होता, आणि त्यांच्यापैकी जे विद्यार्थी बिहार काडरला येतील किंवा पुढे मागे दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या नोकरीत असतील त्याचा उपयोग युनिव्हर्सिटी ऍडमिनिस्ट्रेशनला नक्की होतो या धारणेतून पटना युनिव्हर्सिटीची तशी व्यवस्था होती. मी या घटनेचे एवढे विश्लेषण करण्यामध्ये माझा उद्देश एवढाच आहे की समाजामध्ये ज्या चांगल्या पद्धती चांगल्या व्यवस्था त्याकाळी चालू होत्या त्यांचा उपयोग माझ्या आयएस मध्ये येण्यासाठी कसा झाला हे समजावे. सामाजिक चांगुलपणाचा हा विषय माझ्या मनात कायम चालू असतो. आपल्याला याची परतफेड करणे जमलं पाहिजे, समाजासाठी आपणही काहीतरी चांगलं केलं पाहिजे. समाजाच्या चांगूपणामुळे आपण ह्या नोकरीत येऊन यश, कीर्ती इत्यादी संपादन केलेले आहे ही जाणीव आपण कधीही विसरता कामा नये असं मला वाटतं. सो. तर याप्रमाणे पटना येथील सर्व आवराआवरी करून मी दरभंगा येथे आई-वडिलांकडे आले. मग आपल्याला मसुरी वर्षभरासाठी काय काय सामान लागेल त्याची यादी, त्याची जुळवा जुळवी वगैरे गोष्टी सुरू झाल्या.

पण ज्याची खूप आतुरतेने वाट पाहत होतो ते यूपीएससीचे नियुक्तिपत्र मात्र येत नव्हतं. दरभंगा येथे पोस्टिंग असलेले दोन-तीन आयएएस अधिकारी माझ्या वडिलांकडे कायम येत जात असत. याची तीन कारणे - एकतर माझे वडील ज्योतिष शास्त्रात अतिशय निष्णात होते व भविष्य जाणण्यास उत्सुक व्यक्तिंचा त्याच्याकडे ओढा असे. ते संस्कृत व फिलोसॉफीचे विद्वान असून त्यांच्याकडे मोठा ग्रंथभांडारही होता. त्या औत्सुक्यापोटी काही अधिकारी आमच्याकडे येत. तिसरे कारण म्हणजे त्या उत्तर बिहारच्या संपूर्ण परिसरात दक्षिण भारतीय अशी आमची एकमेव फॅमिली होती आणि बरेच वर्षापासून होती. त्यामुळे त्या भागात नोकरीनिमित्त येणारे सर्वच महाराष्ट्रीयन, गुजराती, तमिळ, तेलगू कानडी, मल्याळी अशी दक्षिण भारतीय मंडळी हक्काने आमच्या घरी येत असत. दरभंगा येथे एयरफोर्सचा मोठा बेस होता व वरिष्ठ अधिकारी तिथे येत. दरभंगा मेडिकल कॉलेज हे त्याकाळी अतिशय प्रसिद्ध व प्रथियश असे मेडिकल कॉलेज होते. तिथे शिकायला येणाऱ्या मुलामुलींसाठी माझे वडीलच लोकल गार्डियन असत. अशाप्रकारे माझ्या वडिलांचा मोठा जनसंपर्क होता. त्याचा उपयोग इथे झाला. श्री अडिगे नावाचे एक वरिष्ठ अधिकारी माझ्या वडिलांना म्हणाले की यूपीएससीचे पत्र येण्याची वाट पाहू नका कारण एका ठराविक दिवशी तुम्ही मसुरीला हजर असणे आणि जॉईन होणं हे गरजेचं असतं, त्यात उशीर झाला तर पुष्कळ त्रास होऊ शकतो. त्यांच्या सूचनेवरून माझा धाकटा भाऊ तातडीने दिल्लीला आला, यूपीएससीचे ऑफिस गाठले, माझे अपॉइंटमेंट लेटरची प्रत मिळवली आणि वडिलांना तार केली की दीदीला लगेचच दिल्लीला रवाना करा - 14 जुलैला मसूरी मध्ये जॉइन होण्याची गरज आहे.

ही तार बहुधा आठ किंवा नऊ जुलैला आमच्या हातात पडली. मग तातडीने माझ्या जाण्याचा रूट ठरला. त्याकाळी रेल्वे रिझर्वेशनला फारसा त्रास होत नसे आणि रिझर्वेशन न मिळाले तरी लांबचा रेल्वे प्रवास करताना जागा मिळायची फारशी मारामारी होत नसे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी निघण्याचा प्लान ठरला. दरभंगा येथून रेल्वेने जवळचेच समस्तीपुर हे मोठे जंक्शन गाठणे. तिथून लखनऊ आणि लखनऊहून दिल्ली असा प्रवासाचा मार्ग ठरला. वडील आणि त्यांचे दोन-तीन विद्यार्थी मला पोचवण्यासाठी समस्तीपुर पर्यंत आले आणि मला लखनऊच्या गाडीत बसवून दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी ती गाडी लखनऊला पोहोचणार होती आणि दुपारी बाराच्या सुमारास लखनऊ-दिल्ली गाडी घ्यायची होती. समस्तीपुर स्टेशनवरच वडिलांनी मला वर्षभरासाठी म्हणून जो काही उपदेश द्यायचा तो देऊन झाला आणि गाडी रवाना झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी लखनऊ स्टेशनवर उतरले. तिथे स्टेशनच्या प्रतीक्षालयातच आंघोळ इत्यादी उरकून घेतली. त्या काळात स्टेशन्स स्वच्छ चांगल्या कंडीशन मध्ये असत. स्टेशनवर अल्प किमतीत उत्तम पुरी भाजीचा नाश्ता मिळत असे त्यामुळे त्या दृष्टीने कुठलीही अडचण नव्हती. तसेच बिहारमधील एकंदरीत बिघडलेल्या परीक्षा वेळापत्रकांमुळे दरभंगा ते जळगाव असा लांबचा रेल्वे प्रवास एकटीने करण्याची सवयही मला मागील चार-पाच वर्षात लागलेली होती. त्यामुळे त्या दृष्टीने कोणालाही काळजी नव्हती. पण लखनऊ स्टेशनवर वरील घटना घडली ती मात्र अनपेक्षित होती हे निश्चित. अशा सर्व घटना आठवत कधीतरी मी निद्राधीन झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी दिली स्टेशनवर भाऊ होताच, आणि त्याच्या हातात माझे नियुक्तिपत्र होते. स्टेशनवरूनच आम्ही दरभंगा येथे वडिलांना, कलकत्त्याला प्रकाशकडे व मुंबईला सासऱ्यांकडे निरोप कळवला. अशा प्रकारे मसुरीला जाऊन ट्रेनिंग घेण्याचा आणि पुढे मोठे अधिकारपद येण्याचा माझा मार्ग प्रशस्त झाला.


Monday, March 29, 2021

एक कर्तबगार सनदी अधिकारी (लीना मेहेंदळे) -- लेखक ???

 

एक कर्तबगार सनदी अधिकारी (लीना मेहेंदळे)

आपल्या राज्याला सनदी अधिक-यांची एक उज्जवल परंपरा लाभलेली आहे. . गो बर्वे पिंपुटकर अशी काही नावे आहेत ज्यांनी आपल्या कुशल प्रशासकीय क्षमतेचा, निष्कलंक चारित्र्याचा, प्रखर बुद्धिमत्तेचा,सहका-यांना स्वतःसोबत नेण्याच्या वृत्तीचा अमीट ठसा महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनावर उमटवला आहे. या यादित अशाच एक थोर व्यक्तींचा समावेश अपरिहार्य आहे, ज्यांचे नाव आहे लीना मेहंदळे, महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त प्रधान सचिव म्हणून ज्यांनी काम केले आहे, गोवा राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपद ज्यांनी विभूषित केले. त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे केला आणार आहे. विविध क्षेत्रातील थोरामोठ्यांच्या भेटी घेऊन त्यांची महती वाचकांना सांगणे, हे एक व्रत आहे असे मी मानतो.

शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी। असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय लीनाताईच्या व्यक्तीमत्तातून जाणवतो. त्यांचे तीर्थरूप डॉ. बलराम सदाशिव अग्निहोत्री व मातोश्री सौ. लीना अग्निहोत्री यांच्या पोटी 31 जानेवारी 1950 ला लीनाताईचा जन्म झाला वडील तत्वज्ञान व संस्कृत भाषेचे विज्ञान प्राध्यापक होते. आई देखील त्याकाळची उच्चविद्याविभूषित होती. त्यामुळे घरातील वातावरण उच्चशिक्षणासाठी पोषक होते. त्यामुळे घरातील वातावरण उच्चशिक्षणासाठी पोषक होते. लीनाताईच्या आजोबांनी व आईने त्यांचा बालपणापासून गणिताचा अभ्यास करून घेतला होता. खानदेशातील धरणागाव येथे हा अग्निहोत्री परिवार राहत असे. ताईचे वडील, 1957 साली ताई सात वर्षाच्या असताना, नोकरिनिमित्त धरणगावाहून जबलपूरला गेले. धरणगावच्या तुलनेत तुलनेत जबलपुर हे खूपच मोठे शहर आहे. त्यामुळे लहानपणीच ताईंना दूरचा रेल्वे प्रवास, मोठ्या शहरात रहाण्याचा अनुभव मिळाला. दोन वर्षात ताईच्या वडिलांनी जबलपुरची नोकरी सोडून बिहार राज्यातील दरभंगा या गावी एका शासकीय संशोधन संस्थेत नोकरी स्वीकारली. त्यामुळे ताईंना जबलपूरहून दरभंग्याला जावे लागे. दरभंगा हे गाव दरभंगा हे गाव जबलपुरपेक्षाही मोठे आहे. ताईचे शालेय शिक्षण दरभंग्यात झाले. बिहार राज्या आजही शिक्षणाच्या संदर्भात देशातील अनेक राज्यांपेक्षा मागासलेले आहे. त्या काळी मुलींचे शिक्षणाचे प्रमाण खुप कमी होते. पण मुलींची स्वतंत्र शाळा होती., ताई बालपणापासूनच बुद्धीमान, मेहनती आहेत, त्यामुळे त्या शाळेत गणित या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवित. संस्कृत भाषेत ताई नेहमीच 90 टक्यांपेक्षा अधिक गुण मिळवत घरापासून शाळा दूर असल्यामुळे ताई सायकल वर बसून जात असत. शाळेत सायकल वर बसून येणा-या ताई या ऐकमेव विद्यार्थिनी होत्या. त्यामुळे शाळाभर त्यांची ओळख सायकल चलानेवाली लडकी, ही होती, बिहार त्या काळी किती मागासलेला होता. ,याची कल्पना एका घटनेवरून येऊ शकते. ताईनंतर 17 वर्षे त्या शाळेत एकही विद्यार्थिनी सायकलवर बसून शाळेत येत नसे. ताईंनी विज्ञान विषय अभ्यासासाठी घेतला होता., पण त्यांच्या शाळेत वैज्ञानिक प्रात्यक्षिके करण्याची सोय नव्हती, त्यामुळे ताईंना मुलांच्या शाळेत प्रात्यक्षिके करण्यासाठी जावे लागत असे.

(ताईचे सगळ्यात मोठे योगदान देवदासींचे आर्थिक पुनर्वसन करणे ही प्रथा बंद पाडणे हे आहे. सांगली जिल्हयात जत नावाचे एक गाव आहे, जेथे दरवर्षी देवदासी होण्यासाठी स्त्रियांना सोडले जाते. त्या दिवशी पोलीस बळाचा वापर करून ताईंनी ही प्रथा बंद पाडली. देवदासींची प्रथा बंद पाडणे ही क्रांतीकारी बाब होती…..!)

ताईंना दरभंगा येथे.B. Sc केले व M. Sc यासाठी त्या पाटण्याला गेल्या . तेथे वसतिगृहात राहून त्यांनी M.Sc ची पदवी 1970 साली मिळवली. Msc. झाल्यावर Ph.D साठीही त्यांनी नोंदणी केली होती, पण आई- वडिलांचा, परिवाराबद्दल सद्भाव असणा-यांचा आग्रह ताईंनी I.A.S परीक्षा द्यावी असा होता. मधल्या काळात ताईंनी पदार्थ विमान या विषयाची प्राध्यापिका म्हणून 1972- 73 या वर्षी पाटण्यात काम केले. 1988 साली त्यांनी इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड विद्यापीठातून M. Sc.(Project Planing) ही पदवी मिळवली. 2007 साली त्यांनी M.BA (H.R) ही पदवी मिळवली. मुंबई विद्यापीठाची LLB ही पदवीही त्यांनी 2010 या वर्षी मिळवली.

वयाच्या 24 व्या वर्षी जुलै 1974 मध्ये त्या I.A.S.ची परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय प्रशासन सेवेत दाखल झाल्या. नोकरीची सुरूवात महाराष्ट्रात झाली. विविध विषय शिकवण्याचा त्यांचा नोकरीत .असतानाच कल होता, ताई मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांमध्ये पारंगत आहेत. त्यांना बंगाली भाषा बोलता येते, संस्कृत, गुजराती, पंजाबी, नेपाळी, मैथिली, ओरिया, आसामी, भोजपुरी व आहिरारी या भाषा वाचताही येतात. थोडक्यात त्या बहुभाषा कोविंद आहेत.

मसुरी येथे वर्षभराचे प्रशिक्षण घेतल्यावर परिविक्षाधीन अधिकारी (प्रोबेशनरी ऑफिसर) म्हणून त्यांनी पुणे जिल्यात विविध प्रशासकीय कामांचा अनुभव घेतला. नंतर पुण्यालाच अस्टिटंय कलेक्टर म्हणून त्या दोन वर्षे होत्या. एक वर्ष महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाच्या डेप्युटी सेक्रेटरी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. या काळात प्रौढ व अनौपचारिक शिक्षणाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. अतिरिक्त जिल्हाधिकारी अर्बन लँह सिलींग या पदावर त्यांनी दोन वर्षे काम केले.

त्यांचा मराठवाडा विभागाशी संबंध आला 1981 साली. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्षभर त्यांनी काम केले नंतर सांगलीला त्यांची याच पदावर बदली झाली. तेथे त्या दोन वर्षे होत्या.

84 साली जिल्हाधिकारी या पदावर प्रथम त्या सांगलीला नेमक्या गेल्या . तेथे वर्षभर त्यांनी काम केले .सांगली हा तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा जिल्हा मा. शरद पवार व बँ. अंतुले या दिग्गजांना बाजूला सारून इंदिराजींनी दादांना दादांना मुख्यमंत्री केले होते. याच कालात इंदिराजींची हत्या झाली होती.मोठ्या कौशल्याने ताईंनी जिल्ह्यातील जनप्रक्षोभ शांततेच्या मार्गाने नियंत्रित केला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी म्हणून सांगलीला त्यांचे वास्तव्य होतेच. कामातून त्यांनी स्वतःची प्रतिमा उजळ बनविलेली होती, लोकांचा विश्वास जिंकलेला होता. म्हणून त्यांना हा प्रसंग हाताळणे सोपे ठरले असावे. जिल्हाधिका-यांच्या कार्यालयाजवळ कॉग्रेस भुवन होते. कॉंग्रेसच्या जिल्हाध्याक्षांचा व ताईंचा चांगला परिचय होता. ताईंनी त्यांना सर्व कार्यकर्त्यांची सभा बोलाविण्यास सुचविले . या सभेत ताईंनी माननिय इंदिराजींवर खुनी हल्ला झाला आहे. डॉक्टर्स त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत आहेत, या अतिशय नाजूक घडीला आपण सर्वांनी संयम बाळगून .

इंदिराजींच्या जिवितासाठी देवाची प्रार्थना करणे आवश्यक आहे असे भावनिक आवाहन केल्यामुळे व सत्य सांगितल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहण्यास मदत झाली . सांगली जिल्हयात तेथे तेथे दोन दिवस त्यांची सर्व व्यस्था करून त्यांना सुरक्षित ठेवले. ताई, जिल्हा पोलीस प्रमुख व जि. प चे मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली येथील गुरूद्वा-यात दर्शन घेण्यासाठी गेले व गुरूद्वा-याच्याही सुरक्षेची व्यवस्था केली. अडचणीच्या प्रसंगातच माणसाच्या व्यक्तिमत्वाचा कस लागतो. ताईंनी या बिकट प्रसंगी जिल्हयात शांतता राखण्यासाठी दूरध्वनी क्षेपकाद्वारे लोकांना इंदिराजींबद्दलची सत्य परिस्थिती सांगून शांतता राखण्याचे आवाहन केले.

ताईंनी पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकपद तीन वर्षे सांभाळले. या महामंडळाच्या कार्यक्षेत्रात पश्चिम महाराष्ट्राचे नऊ जिल्हे येतात. या जिल्ह्यांसाठी औद्योगिक धोरण ठरविणे, मोठ्या, मध्यम, लघू आणि छोट्या उद्योगांच्या विस्तार व विकासाची काळजी घेँणे, उद्योजकता वाढीला लागण्यासाठी प्रयत्न करणे तसेच शासन अंगीकृत तीन बड्या उद्योगांच्या वाणिज्यविषयक बाबींकडे लक्ष पुरविणे या जबाबदा-या पार पाडाव्या लागत. प्रिया स्कूटर बनविणारा महाराष्ट्र स्कुटर्स हा कराखाना, एचएमटी घडयाळांचे एकत्रीकरण करणारा अभिजीत समयदर्शिका हा कारखाना व चैतानी डिस्टीलरी जी महाराष्ट्रात सर्वात मोठी डिस्टीलरी होती जी कारखान्यांना लागणा-या अल्कहोलचे उत्पादन करीत असे.

ताईंचे सगळ्यात सोठे योगदान देवदासींचे आर्थिक पुनर्वसन करणे व ही प्रथा बंद पाडणे हे आहे. सांगली जिल्हयात जत नावाचे एक गाव आहे. जेथे दरवर्षी देवदासी होण्यासाठी स्त्रियांना सोडले जाते. ज्या दिवशी स्त्रियांना सोडले जाते . त्या दिवशी पोलीस बळाचा वापर करून ताईंनी ही प्रथा बंद पाडली. देवदासींची प्रथा बंद पाडली. देवदासींची प्रथा बंद पाडणे ही क्रांतीकारी बाब होती. देवदासींच्या आर्थिक पुनर्वसनीसाठी त्यांना कुक्कुटपालन, घड्यालाची Assembly , लोकर विणकाम अशा उद्योगांचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली. त्यांच्या या कर्यांने त्यांना राज्यभर प्रसिद्धी मिळाली. देवदासींचे आर्तिक पुनर्वसन व ही प्रथा बंद पाडण्याच्या बाबतीत समाजाला चालना देण्यात त्यांना यश आले. देवदासींच्या मुलांना ताईबदद्ल नितांत आदर आहे.

वर्षभरासाठी ताई पुण्यातील यशदा, या राज्य शासनाच्या संस्थेच्या प्रथम अतिरिक्त संचालक व नंतर संचालक होत्या. शासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था व पंचायत समित्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी यांचे ग्रांमीण विकासाच्या संदर्भात प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्याचे दायित्व ताईवर होते.

चार वर्षे ताई नॅशनल इन्सिटट्युट ऑफ नॅचरोपॅथीचा भारत सरकारच्या संस्थेच्या संचालक होत्या. देशभर निसर्गोपचार करणा-यांसाठी ताईंनी अनेक लेख लिहिले.

नाशिकच्या विभागीय आयुक्त म्हणून काम करताना त्यांना नाशिकच्या मुक्त विद्यापीठाचे कुलगुरूपदही भूषवावे लागले. दोन वर्षे लीनाताईंनी महाराष्ट्र राज्याचे सेटलमेंट कमिशनर म्हणून काम केले आहे.

एक वर्ष महाराष्ट्र स्टेट फार्मिग कॉर्पोशन पुण्याच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून मेहेंदळे मॅडमनी काम केले. या फर्मिंग कॉर्पोरेशनच्या ताब्यात 70, 000 एकर जमीन आहे. जवळपास 35,000 एकरावर उसाचे उत्पादन घेतले जाते. संपूर्ण आशिया खंडात सर्वाधिक उसाचे उत्पन्न ही संस्था धेते. अशा संस्थेचे व्यवस्थापकीय संचालकपद सांभाळणे हे मोठे जिकारीचे काम असणार, उत्पादन, विक्री, भविष्यकालीन योजना बनविणे, संस्थेचे प्रशासन करणे अशा विविध जबाबदा-या त्यांना पार पाडाव्या लागल्या असतील.

नॅशनल कमिशन फॉर वुमेनच या दिल्लीस्थित संस्थेच्या संयुक्त सचिव म्हणूनही मॅडमनी काम केले. स्त्रियांवर होणारे विविध स्वरूपाचे अन्याय, त्यांची हत्या हा आपल्या देशातील एक मोठा प्रश्न आहे. महिलांचे आर्थिक, सामाजिक व राजकीय सबलीकरण होणे, ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने विविध समस्यांना सखोल अभ्यास करून शासनाला धोरणे ठरविण्यात मदत करणे, महिला कैद्यांना सुयोग्य वागवणूक मिळते ना याबद्दल दक्ष असणे अशी कामे ही संस्था करते.

यानंतर केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयात सचिव पदावर मॅडमची नियुक्ती झाली. त्यांना P.C.R. A . या संस्थेच्या कार्यकारी संचालक म्हणूनही काम करावे लागे. या काळात मॅडमनी एनर्जी कन्झरव्हेशनच्या प्रचारासाठी दूरदर्शन मालिका निर्माण केल्या. दूरदर्शनवर मालिका निर्माण केल्या. दुरदर्शनवर 962 भागांत ज्या प्रसारित झाल्या. खेल खेल में बदलों दुनिया व आसामी भाषेतील मालिकेचे बुंद बुंद की बात असे या मालिकांचे शीर्षक होते. एनर्जी वाचविण्यासाठी प्रचार करण्यासाठी दूरदुर्शन हे एक उत्तम माध्यम आहे. त्या काळात आजच्याइतके चॅनेल्सचे पीक बहरले नव्हते. दुरदर्शन हे एक उत्तम माध्यम आहे. त्या काळात आजच्याइतके चॅनेल्सचे पीक बहरले नव्हते. दूरदर्शन खेड्यापाड्यात, घरोघर बघितले जात असे. शासकीय कल्पक असला की, तो उपलब्ध साधन सामुग्रीचा फार परिणामकारक उपयोग करून घेतो. विविध भारतीवर चार पात्रांच्या संवादाद्वारे एनर्जी बचतीचा विचार घरोघर पोहोचविण्याची मॅडमनी व्यवस्था केली. इतकेच नव्हे तर चांदोबा मासिकाने 12 भाषांत उर्जा बचतीसाठी विशेषांक काढला. 75,000 अंक 12 भाषांत मिळून प्रसिद्ध झाले होते. असे विविध उपक्रम मॅहम पोस्टरवर काम करताना राबवत .

यानंतर मॅडम पशुसंवर्धन विभागाच्या प्रधान सचिव म्हणून नेमल्या गेल्या . त्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिवपदही त्यांनी विभूषित केले. कॅट या स्थेच्या बंगोलर व मुंबई येथील कार्यालयात सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे.

त्यांच्या नोकरीतील प्रगतीचा हा चढता आलेख त्यांच्या कार्यक्षमतेचा, बुद्धिमत्तेचा द्योतक आहे. विविध पदांवर काम करताना स्वतःच्या कौशल्याचा वापर करून माणसे पदाची गरिमा जशी वाढवितात त्याचप्रमाणे विविध पदांवर काम केल्यामुळे त्या व्यक्तींची अनुभवसमृदीही वाढते.

सेवानिवृत्तीनंतर ताई सुखासीन जीवन आळसात घालवत नाहीत. भांडारकर प्राच्यविद्या संशोघन केंद्रांत गेले काही महिने दर आढवडयात दर बुधवारी महाभारतावर व्याख्यान देतात. पर्यावरण, प्रशासकीय सुधारणा, स्त्रियांचे प्रश्न यासंबंधी होणा-या परिषदा ,व्याख्यान सत्रे, परिसंवाद यात त्या व्यस्त असतात. सामान्यतः शासकीय अधिका-यांचे जीवन साचेबद्ध असते. याउलट ताईंचे जीवन शरद ऋतूत वाहणा-या एखाद्या महानदीसारखे गतिशील, पारदर्शी व सभोवलतालचा परिसर, समृद्ध करणारे आहे त्या, शरीराने उंचपु-या, धिप्पाड नाहीत पण अतिशय करारी, दृढनिश्चयी, कामात पारंगत असाव्यात. कुठेही स्वतःचे
मोठेपण मिरविणे नाही, इतरांना तुच्छ लेखणे नाही असे मुरलेल्या प्रगल्भतेचे त्यांचे वागणे आहे. झापड लावून विचार करण्याची त्यांची पद्धत नाही. भेटायला येणा-याला तणावमुक्त करून मोकळे करण्याची कला त्यांना साध्य झाली आहे.

उत्तम प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी नावलौकिक जसा कमावला. आहे तशाच त्या उत्तम लेखिकाही आहेत. त्यांची मराठी भाषेत11 व हिंदी भाषेत 14 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी कवी कुसुमाग्रजांच्या कवितांचा हिंदी भाषेत अनुवाद केला आहे. कुसुमाग्रजांच्या कवितांचे भाषांतर करणे ये-या गबाळ्याला जमणे शक्य नाही. त्यांची 19 पुस्तके अनुवादाचीच आहेत. एका मराठी नाटका व एका कादंबरीचाही त्यांनी अनुवाद केला आहे. द लास्ट पास ही इंग्रजी भाषेतील कादंबरी त्यांनी मराठीत अनुवादित केली हे. लहान मुलांसाठी देखील त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. पक्षीनिरीक्षण, निसर्गोपचार, प्रशासकीय सुधाररा हे त्यांचे आवडते विषय आहेत. संगीचाचीही त्यांना आवड आहे. त्या बासरीही छान वाजवितात. तुसडेपणा त्यांच्या स्वभावात अजिबात नाही. सामान्यतम माणसाशी देखील त्या सुसंवाद साधतात. मग त्यांच्या संदर्भात ज्ञानेश्वरीतील एक ओवी आठवते.

थोपणपन्हासांडिजे।

व्युत्पत्ती आघवी विसरिजे।

जै जगा धाकुटे होईजे।

तेजवळीक माझी।।

परमेश्वराचे मनोगत सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ही ओवी लिहिली आहे.

मॅडमचे लहान भाऊ देखील I.A.S ऑफिसर होते. I.I.T पवई येथून आभियांत्रिकीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन त्यांनी I.A.S केले. भाऊ बहीण तसेच एकाच घरातील दोन मुले I.A.S असणे ही बाब दुर्मिळच असावी. ताईच्या लहान बहिणीला डॉक्टरच व्हायचे होते, अन्यथा ती पण I.A.S होऊ शकली आसती.

प्रशासकीय जबाबदा-या ही बाब अतिशय ताणाची बाब असते. प्रचंड ताणाला तोंड देण्याचे प्रसंग त्यांच्या नोकरीत अनेक आले असतील. त्यातले मोजके दोन येथे उद्धृत करतो आहे.

निवडणूक अधिकारी म्हणून काम करताना, पुण्य़ातल्या एका सतप्रवृत्तीच्या मातब्बर उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणावरून त्यांना फेटाळावा लागला होता. तत्कालीन मुख्यमंत्र्यांची नाराजी त्यांना पत्कारावी लागली. कलेक्टर, कमिशननर यांची बोलणी खावी लागली,पण हा अप्रिय निर्णय घेताना त्या कचरल्या नव्हत्या. तणावात रात्र काढली पण दुस-या दिवसापासून नेहमीप्रमाणे कामकाज केले

भावनिक तणावाच्या प्रसंगालाही त्यांना एकदा तोंड द्यावे लागले. झेंडावंदनाची पहिल्यांदा सलामी देताना त्या भावनिक झाल्या होत्या . हा कार्यक्रम बघायला येण्याची त्यांच्या आईची इच्छा होती, पण ताई मात्र मातोश्रींना सोबत नेण्यास तयार नव्हत्या . कारण झेंडावंदन प्रसंगी सलामी घेण्याचा त्यांचा पहिलाच प्रसंग होता म्हणून त्या भावविवश झाल्या होत्या, पण जिल्हा पोलीस प्रमुखांनीच ताईच्या मातोश्रींची इच्छा पूर्ण केली.

इतक्या मोठ्या पदावर काम केलेली, इतकी कीर्ती मिळविलेली व्यक्ती इतकी साधी, सरळ, निर्गवी, हसतमुख, असू शकते. हे बघणे हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. ताई, तुकाराम मुंढे असे कणखर, निस्पृह अधिकारी देशाला लाभले व राजकीय पुढा-यांनी त्यांना मुक्तपणे काम करू दिले तर देशाचे भवितव्य उजळायला वेळ लागणार नाही.

नांदेडच्या तरूण- तरूणींसाठी वेगवेगळ्या क्षेत्रांतील दिग्गजांचे आदर्श मांडणे, हा माझ्या कायम आवडीचा विषय आहे. हा लेख या तळमळीचाच एक भाग आहे. नुकताच जागतिक महिला दिन होऊन गेला, एका कार्यक्षम महिलेला या लेखाद्वारे मी अभिवादनही करतो आहे.....!